टीम मंगळवेढा टाईम्स ।
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये आणखी तीन दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे.
किनारपट्टीच्या भागात एक ते दोन दिवस जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र बहुतांश ठिकाणी, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
बंगालच्या उपसागरापाठोपाठ गेल्या दोन दिवसांत पूर्व-मध्य अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
सध्या हे क्षेत्र तीव्र झाले असून, अरबी समुद्रातून उत्तर महाराष्ट्रमार्गे पश्चिम मध्यप्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या सहा दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणामध्ये पावसाने हजेरी लावली आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई आणि पुण्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत सोलापूर, सांगली, महाबळेश्वर आणि कोकणात काही भागांत पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात आणखी तीन दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्यात एक ते दोन दिवस पावसाळी वातावरण राहणार असून, २३ नोव्हेंबरनंतर या भागात हवामान कोरडे होणार आहे. विदर्भात पुढील तीन ते चार दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण विभागात कायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागांत पावसाळी वातावरण राहणार आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत पावसाळी वातावरण राहणार आहे.(स्रोत;लोकसत्ता)
आंध्रप्रदेशात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू तर १०० जण बेपत्ता
आंध्रप्रदेश राज्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० जण बेपत्ता झाले आहेत. वायूदल, ‘एस्.डी.आर्.एफ्.’ आणि अग्नीशमन दल यांच्या साहाय्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेकांना वाचवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी दूरभाषवरून संवाद साधला आणि पूरस्थितीचा आढावा घेऊन ‘राज्याला सर्वोतोपरी साहाय्य केले जाईल’, असे आश्वासन दिले.
मुसळधार पावसाने नद्या आणि नाले यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावे पुराने वेढली गेली आहेत. काही ठिकाणी रस्तेही वाहून गेले आहेत.
तिरुमला येथील डोंगरांवरून वहाणार्या पाण्याचे रौद्ररूपही येथे पहायला मिळत आहे. तिरुपतीच्या बाहेरील स्वर्णमुखी नदीला पूर आला आहे. पुरामुळे परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की, बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर आणि जेसीबी यांचे साहाय्य घ्यावे लागत आहे.
कडप्पा जिल्ह्यातील अन्नामय्या परियोजनेतील बांध फुटल्यामुळे अचानक पूर आला आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी येथील शिवमंदिरात पूजा करण्यासाठी गेलेले भाविक अचानक आलेल्या पुरामुळे अडकले, तर काही जण वाहून गेले. बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी बचाव अभियान चालू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज