टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर, नगर व पुणे जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण 100 टक्के भरले आहे. धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नाही.
परंतु पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याने मंगळवारी मध्यरात्री शंभर टक्क्यांची पातळी ओलांडली आहे.
त्यामुळे आगामी वर्षात सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, शेतकऱ्यांचीही चिंता दूर झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बागायती क्षेत्रात वाढ होण्यात उजनी धरणाचा मोलाचा वाटा आहे. रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा सोलापूर जिल्हा आता खरीप पिकांकडे झुकला आहे. जिल्ह्यातील वाढलेल्या उसाच्या क्षेत्रामुळे सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख राज्यात झाली आहे.
कारखानदारीतून रोजगार, व्यवसाय वाढीस मदत झाली असून बॅंकिंग व्यवसायही वाढला आहे. दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सोलापूर जिल्ह्याला उजनी धरणाचा फार मोठा आधार लाभला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक राहिल्याने उजनी धरण यंदा उशिरा भरले, असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले.
आता पाण्याचे काटकसरीने वापर करावा लागणार असून, सिंचन व पिण्याच्या पाण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उजनी धरण 100 टक्के भरले आहे, परंतु धरणात 111 टक्क्यांपर्यंत पाणी मावते. आता ऑक्टोबर महिना असल्याने पुढे पावसाची शक्यता कमीच आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत भीमा नदीद्वारे पाणी खाली सोडण्याचा निर्णय घेतला जाणार नाही.
सध्या दौंडवरून आठ हजार 300 तर बंडगार्डनवरून एक हजार 800 क्युसेकचा विसर्ग येऊ लागला आहे. परंतु, त्या ठिकाणाहून 50 हजार ते एक लाखापर्यंत विसर्ग धरणात येऊ लागल्यास धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडले जाईल, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज