टीम मंगळवेढा टाईम्स ।
आजपासून दिवसाच्या तापमानात वाढ होण्याची व पुढील आठवड्यासह फेब्रुवारीमध्ये वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार असून, आतापासूनच शेतकऱ्यांना आवश्यक ती खबदरादी म्हणून उपाययोजना करावी लागणार आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम गेल्या आठवड्यात विदर्भासह राज्यभरात दिसून आला होता. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवस सर्वत्र काही प्रमाणात थंडीची लाट अनुभवला आली होती. त्यानंतर संपूर्ण जानेवारीत कडाक्याच्या थंडीची शक्यता वर्तविण्यात येत होती.
परंतु, तीन ते चार दिवसांपासून अचानक वातावरणात बदल दिसून येत असून, दिवसाच्या तापमानात काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे
सोमवारी (ता.१८) अकोल्यात कमाल ३२.६ तर, किमान १८ अंश सेल्सिअसची नोंद झाली. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे चित्र सुद्धा अकोल्यासह काही भागात आहे.
या आठवड्यात वातावरणात अशाच प्रकारे बदल राहून दिवसाच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
याचाच परिणाम म्हणून पुढील आठवड्यासह फेब्रुवारीत वादळी पावसाची शक्यता सुद्धा वर्तविण्यात आली आहे. याचा गहू, हरभरा, भाजीपाला व फळ उत्पादकांना मात्र मोठा फटका बसून, नुकसान सोसावे लागू शकते.
वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम पिकांवर झाला असून, बहुतांश भागात हरभऱ्याच्या पिकावर किडीचा प्रादूर्भाव झाल्याचे चित्र आहे.
वातावरणातील या बदलाचा इतर पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना कीड नियंत्रण व्यवस्थापनाचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज