टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहर-जिल्ह्यातील कोरोना वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात येणारी सर्वच प्रवासी वाहने पोलिसांनी तपासावीत असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
सोलापूर शहरात व जिल्ह्यात प्रवेश करताना अथवा जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हवालदार, पोलिस नाईक, पोलिस शिपाई, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले आहेत.
दरम्यान, कारवाई करताना वाहनातील व्यक्तीकडे मास्क नसल्यास त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड करावा, अशा सूचनाही आदेशातून जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
एकदा दंड भरुनही त्या वाहनचालकाने नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचे वाहन सात दिवसांसाठी जप्त केले जाणार आहे. तर वाहनचालकाचा परवानादेखील निलंबित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करणाऱ्या पोलिस व आरटीओ अधिकाऱ्यांना दिला आहे.
तीनचाकी वाहनात तीन तर चारचाकीत चार (चालकासह) प्रवासी असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय वाढीव प्रवासी असल्यास प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे दंड केला जाणार आहे.
या आदेशानुसार तत्काळ कार्यवाही सुरु करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज