टीम मंगळवेढा टाईम्स ।
पाण्यासाठी गेली ३३ वर्षे अविरत संघर्ष सुरू आहे. हा लढा थांबता कामा नये. आता तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला-मंगळवेढा व वंचित भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी, असे स्पष्ट प्रतिपादन पाणी परिषदेचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले. शेटफळे (ता. आटपाडी) येथे झालेल्या ३३ व्या पाणी परिषदेत प्रा. शिवाजीराव काळुंगे बोलत होते.
या परिषदेत टेंभू उपसा सिंचन योजनेला क्रांतीवीर पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक आणि एकमुखी ठराव पारित करण्यात आला.
याप्रसंगी निमंत्रक वैभवकाका नायकवडी, माजी आ.राजेंद्रअण्णा देशमुख, आ.डॉ.बाबासाहेब देशमुख, अॅड.सुभाष पाटील, प्रा.आर. एस. चोपडे, प्रा.बाळासाहेब नायकवडी, विश्वंभर बाबर, प्रा.दत्ताजीराव जाधव, गौरव नायकवडी, सचिन देशमुख, आनंदराव पाटील, शिवाजीराव पाटील, ॲड.भारत पवार, प्रा. येताला भगत यांचेसह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे काळुंगे म्हणाले, क्रांतीवीर स्व.नागनाथअण्णांनी दुष्काळी भागाला पाण्याचे स्वप्न दाखवले, तेव्हा लोकांना विश्वास वाटत नव्हता. पण आज ते सत्यात उतरले आहे. स्व.भाई गणपतराव देशमुख यांनी विधिमंडळात या लढ्याचे उत्तम प्रतिनिधित्व केले. स्वातंत्र्यानंतरची ही ऐतिहासिक चळवळ आता शेवटच्या टप्प्यावर आहे.
सूर्यासारखे तेजस्वी काम क्रांतीवीर स्व.नागनाथअण्णा आणि भाई स्व.गणपतराव देशमुख यांचे आहे. त्यांच्या नेतृत्वातच सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील प्रत्येकी पाच आणि सोलापूर जिल्ह्यातील तीन दुष्काळी तालुक्यांसाठी आटपाडी केंद्रस्थानी ठेवून या चळवळची सुरुवात झाली. त्यांच्या संकल्पनेतूनच टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी यासारख्या तीन महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी झाली.
कृष्णा नदीवरील म्हैसाळ योजनेचे पाणी पाच टप्प्यांत उचलून थेट सांगोला व मंगळवेढा तालुक्यात पोहोचले आहे. हे त्यांचे दूरदृष्टीचे उदाहरण आहे. टेंभूचे पाणी वाढेगावपर्यंत आले आहे, ते माण नदीतून ओझेवाडीमार्गे भीमा नदीपर्यंत पोहचले, तर संपूर्ण मंगळवेढा भागालाही त्याचा लाभ होईल.
येत्या काही दिवसात चळवळीतील सर्वांनी एकत्रित येऊन पाणी परिषदेत समाविष्ट असणाऱ्या तालुक्यांचा दौरा काढून अपूर्ण जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेऊ आणि पुढील पाणी परिषद अधिक योजनाबद्ध पद्धतीने पार पाडू असेही त्यांनी स्पष्ट केले.
वैभव नायकवडी म्हणाले, ज्यांना पाणी आले आहे त्यांनी वंचित भागासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अपूर्ण योजना तातडीने पूर्ण व्हाव्यात, यासाठी चळवळ अधिक संघटीत करावी.
स्व.नागनाथअण्णा नायकवडी आणि कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे अध्यक्ष स्व. आ.भाई डॉ. गणपतराव देशमुख यांच्या प्रेरणेतून अथकपणे पाण्यासाठी लढा उभा राहिला. त्यामुळे अतीतटीच्या भागात पाणी आल्याने दुष्काळग्रस्त हे नाव पुसले जात आहे.
शेतात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही, या ध्यासाने पाण्यासाठीची संघर्ष चळवळ उभी राहिली. ज्या योजना कागदावर होत्या त्या प्रत्यक्षात आंमलात आल्या आहेत. मिळालेले पाणी समन्वयाने टिकवावे लागणार आहे. योजनेच्या पूर्ततासाठी सर्वांनी संघटीत होऊन काम करणे ही गरज आहे.
आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी यंदा पाण्याचा पुरवठा एक महिना उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करून नियोजन अधिक काटेकोर करण्याची गरज व्यक्त केली.
गौरव नायकवडी यांनी, पाणी आले म्हणून सारे प्रश्न सुटले असे नाही, अजूनही बरेच काम बाकी आहे, असे सांगून टेंभू योजनेस अण्णांचे नाव देण्याची मागणी केली.
माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भवानी विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या २७ वर्षांच्या लढ्याची आठवण करून दिली. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी थेट बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ॲड. सुभाष पाटील, हणमंतराव देशमुख, व्ही. एन. देशमुख, विष्णूपंत चव्हाण, प्रा. आर. एस. चोपडे, शिवाजीराव पाटील, सचिन देशमुख, आनंदराव पाटील, ॲड. भारत पवार यांनीही आपली मते मांडून सिंचन योजनेविषयी जनतेच्या भावना अधोरेखित केल्या.
प्रास्ताविक बाळासाहेब नायकवडी तर स्वागत प्रा. सी.पी. गायकवाड यांनी केले. परिषदेचे सूत्रसंचालन आर. बी. गायकवाड यांनी केले.
याप्रसंगी तेरा दुष्काळी तालुक्यांच्या शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असलेल्या या परिषदेत अनेक मागण्या आणि जवळपास वीस ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज