टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला कालपासून सुरुवात झाली आहे. कोलोंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर उभय संघांमध्ये आज पहिला टी-20 सामना खेळवण्यात आला.
कालच्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर 38 धावांनी मात केली आहे. आधी सूर्यकुमार यादवचं अर्धशतक (50) आणि कर्णधार शिखर धवनच्या 46 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर 165 धावांचं आव्हान उभं केलं होतं.
परंतु हे आव्हान श्रीलंकन फलंदाजांना पेलवलं नाही. कारण भुवनेश्वर कुमारसह (4 बळी) सर्वच गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना अवघ्या 126 धावांत रोखलं. त्यामुळे 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.
दरम्यान, आजच्या सामन्यात चार बळी मिळवणाऱ्या भुवनेश्वर कुमार याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
#TeamIndia win the 1st #SLvIND T20I by 38 runs 💪
We go 1-0 in the series 🙌 pic.twitter.com/9FfFbx2TTZ
— BCCI (@BCCI) July 25, 2021
165 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने सुरुवात चांगली केली होती. मात्र कृणाल पंड्याने मिनोद भानुका याला 10 धावांवर बाद करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली.
श्रीलंकेकडून सलामीवीर अविष्का फर्नांडो (26) आणि चरीत असालंका (44) या दोघांनी काही वेळ प्रतिकार केला, मात्र या दोघांव्यतिरिक्त श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
परिणामी मोठं आव्हान नसतानादेखील भारतीय गोलंदाजांनी हा सामना श्रीलंकेच्या हातून सहज हिरावला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 4 बळी मिळवले. तर दीपक चाहरने 2 बळी मिळवले. कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज चमिराने योग्य ठरवला. त्याने पहिल्याच चेंडूवर सलामीवीर पृथ्वी शॉला (0) बाद केलं.
त्यानंतर संजू सॅमसन (27) कर्णधार शिखर धवन (46) आणि सूर्यकुमार यादव (50) अर्धशतक लगावत भारताचा डाव सावरला. परंतु अखेरच्या षटकात खालच्या क्रमांकावरील फलंदाजांना चांगली फलंदाजी करता न आल्याने भारताला 164 धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेडून वानिंदू हसरंगाने 2 आणि चमिका करुणारत्ने या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट मिळवल्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज