मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
चौदा वर्षे १० महिन्यांची दीर्घ प्रतीक्षा संपली. आज, सोमवार, ९ जून २०२५ रोजी सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावरून पुन्हा एकदा प्रवासी विमानसेवेला प्रारंभ होत आहे.
वास्तवात सप्टेंबर १९४८ मध्ये भारतीय सेनादलाने मराठवाडा मुक्तिसंग्राम प्रसंगी हैदराबादच्या निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी होटगी रोड येथील विमानतळाची निर्मिती केली होती. त्यानंतर अडगळीत पडलेल्या या विमानतळाची पुनर्बांधणी तब्बल ३७ वर्षांनी, म्हणजे १९८४ मध्ये करण्यात आली.
पुढे २५ वर्षे काहीच झाले नाही. फेब्रुवारी २००९ मध्ये सोलापूर- मुंबई प्रवासी विमानसेवा आठवड्यातील चार दिवस याप्रमाणे सुरू झाली, ती अल्पजीवी ठरली. ऑगस्ट २०१० मध्ये ही सेवा बंद पडली. या १८ महिन्यांत १३५८ विदेशी पर्यटक सोलापुरात आले, देशांतर्गत पर्यटक वेगळे.
सोलापुरात नेत्यांची विमाने ये-जा करीत राहिली. शेजारील अनेक छोट्या शहरांसाठी विमानसेवा सुरू झाली. पण, सोलापूरला सातत्याने डावलले गेले. याची सल सोलापूरकरांना बोचत राहिली. दुसऱ्या बाजूला, गेल्या दोन दशकांत सोलापूरचा कायापालट झाला.
जिल्ह्यातून जाणारे सर्व महामार्ग अनेक पदरी झाले. तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट या श्रद्धाकेंद्रांना जोडणारे मार्ग अविश्वसनीयरीत्या बदलले. महामार्गांवरील दुभाजकांत शोभेची सुंदर झाडे, वेली डोलू लागल्या.
महामार्गांच्या दोन्ही बाजूस देशी वृक्षांची लागवड झाली. रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण झाले. स्थानकाचा विस्तार झाला. अनेक सुधारणा झाल्या. एकेकाळी अस्वच्छता हीच ओळख बनलेले रूळ बायोटॉयलेटमुळे टप्प्याटप्प्याने स्वच्छ बनले. दळणवळणातील या प्रगतीसोबतच सोलापूरने अनेक क्षेत्रांत क्रांती केली.
स्मार्ट सिटीसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेत सोलापूरचा समावेश झाला. ज्याची आम्ही कधी कल्पनाच केली नाही, अशा अनेक गोष्टी प्रत्यक्षात उतरल्या. शेती उत्पादन आणि बाजारपेठेत सोलापूरने झेप घेतली. कांदा बाजारपेठेत सोलापूरने देशात कीर्तिमान स्थापित केला.
केळी, डाळिंब, बेदाणा, ऊस उत्पादनात झेंडा रोवला. गारमेंट क्षेत्र असो की शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र असो की बांधकाम, सोलापूर मागे राहिला नाही. प्रगतीच्या या महामार्गात एकच गतिरोधक होता – एअर कनेक्टिव्हिटीचा अभाव; तो आता दूर होत आहे, हे सुचिन्ह म्हटले पाहिजे.
प्रवासी विमानसेवेसाठी झालेला विलंब एका अर्थाने आपल्या पथ्यावरच पडला, असे म्हटले पाहिजे. कारण, या निमित्ताने का होईना आम्ही सोलापूरकर एक दिशेने विचार करू लागलो. विकासाच्या मुद्द्यावर पुढे आलो.
सामान्य माणसाच्या आकांक्षांकडे धोरणकर्ते दीर्घकाळ दुर्लक्ष करू शकत नाहीत, हेही सिद्ध झाले. लोकांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे राज्यकर्ते भेटतात, हे सत्य आहे. मोठा विचार करणे आणि आपण आपली पात्रता वाढवत राहणे, हेच यशाचे गमक आहे, हा विचार अंगी बाणवू तर उद्याची सकाळ आपल्या सर्वांसाठी शुभ आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज विमानसेवेचे उद्घाटन; मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज विमानसेवेचे उद्घाटन होणार आहे. सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी होटगी रोड विमानतळाच्या प्रांगणात उद्घाटन समारंभ होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाच प्रवाशांना बोर्डिंग पास मिळणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री हिरवा झेंडा दाखवतील. १० वाजून ३० मिनिटांनी विमान गोव्याकडे उड्डाण करील.
सकाळी ७:४५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून सोलापूरकडे रवाना होतील. साडेआठ वाजता सोलापूर विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानसेवेचा उद्घाटन कार्यक्रम कार्यक्रम होईल. तो साडेदहापर्यंत सुरू राहील.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आसरा चौकातील एका हॉटेलमध्ये मराठी पत्रकार संघाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार कार्यक्रम नियोजित आहे.
याप्रसंगी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, आदींची उपस्थिती राहणार आहे. पुरस्कार कार्यक्रम संपल्यानंतर ११ वाजून ५० मिनिटांनी ते विमानाने मुंबईकडे रवाना होतील.
केंद्रीय विमान नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे सकाळी नऊ वाजता सोलापूर विमानतळावर आगमन होणार आहे. आज सकाळी साडेनऊ वाजता विमानसेवा उद्घाटन कार्यक्रमाला ते हजेरी लावतील.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज