टीम मंगळवेढा टाईम्स ।
तांत्रिक अडचण व आरोग्यविषयक समस्यांमुळे परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा लगेच परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या समन्वय समितीने हा निर्णय घेतला आहे.
परंतु, अडचण आल्यानंतर पुढील दहा दिवसांत संबंधित विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमार्फत विद्यापीठाकडे अर्ज करावा लागणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा सध्या ऑनलाइन सुरू आहे. दररोज तीन सत्रात जिल्हाभरातील अंदाजित 25 ते 26 हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात. ऑनलाइन परीक्षेमुळे निकालास विलंब होत नाही.
विद्यार्थी पुढील प्रवेश अथवा नोकरीसाठी अडचणी येणार नाहीत, याची खबरदारी घेत विद्यापीठाने परीक्षेनंतर काही दिवसांतच निकाल जाहीर करण्याचेही नियोजन केले आहे. तत्पुर्वी, लॉ आणि बी-एड्ची परीक्षा पार पडली असून त्याचा निकाल उद्या सोमवारी जाहीर केला जाणार आहे.
सध्या 98 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा सुरळीत सुरु आहे. प्रॉक्टिरिंग प्रणालीमुळे (विद्यार्थ्यांच्या हालचाली व लोकशेनवर वॉच) परीक्षेत पारदर्शकता आल्याचेही विद्यापीठाचे म्हणणे आहे.
दरम्यान, परीक्षेची लिंक ओपन झाली नाही अथवा मधूनच नेटवर्क गेले, गाडीचा अपघात झाला, अचानक आजारी पडला, अशा कारणांमुळे परीक्षा देता न आलेल्यांना पुन्हा संधी दिली जाणार आहे.
त्यांनी महाविद्यालयांमार्फत केलेल्या अर्जावर कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरु डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे व परीक्षा नियंत्रक डॉ. विकास कदम यांची समन्वय समिती निर्णय घेणार आहे.
दहा दिवसांत महाविद्यालयामार्फत अर्ज करणे बंधनकारक
तांत्रिक कारणास्तव परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. संबंधित विद्यार्थ्याने दहा दिवसांत महाविद्यालयामार्फत अर्ज करणे बंधनकारक आहे. कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव व परीक्षा नियंत्रकांची समन्वय समितीकडून त्या अर्जावर निर्णय होईल. – डॉ. विकास कदम, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज