मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पालिका आणि नगरपंचायत परिसरातील शाळांना सुट्टी दिली असली तरी शिक्षकांना मात्र शाळेत येऊन हजेरी लावणे बंधनकारक असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.
राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार शालेय शिक्षण विभागाने 31 मार्चपर्यंत शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहे. परंतु शिक्षकांबाबत कोणताही निर्णय न घेतल्यामुळे शिक्षकांनी शाळेत यायचे की नाही, असा संभ्रम निर्माण झाल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा वगळता अन्य विद्यार्थ्यांना सुट्टी आहे. ज्या दिवशी परीक्षा नसेल, त्यादिवशी शिक्षकांनी शाळेत हजर राहावे, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पुणे विभागातील शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांनी याबाबत 13 मार्च रोजी आदेश काढून दहावी व बारावीच्या परीक्षांचे काम वगळता अन्य दिवशी शिक्षकांनी शाळेत येऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मात्र राज्यातील इतर शिक्षणाधिकारी कार्यालयांनी मात्र तसा उल्लेख पत्रात न केल्याने शिक्षकांना शाळेत हजर राहण्याविषयी शाळा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.शिक्षकांनाही सुट्टी द्यावी, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे
जाहिरात
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज