टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्यात आता वेगवान हालचाली पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवरुन परतल्यानंतर आता थेट राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत.
दिल्लीत फडणवीसांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केलीय. त्यानंतर तातडीने ते मुंबईत दाखल झाले.
आता ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्यासह अजून काही भाजप नेते आहेत.
त्यामुळे राज्याच्या सत्ता संघर्षात आता भाजप आणि राज्यपालांची अधिकृत एन्ट्री झाल्याचंच पाहायला मिळत आहे.
बहुमत चाचणीची मागणी करणार?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवरुन परतल्यानंतर आता थेट राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणीस राज्यपालांना बहुमत चाचणीसाठी मागणी करणार असल्याचे बोलले जात आहे.
शेकडो जीआर अपलोड नाहीत
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की,
जवळपास 450 जीआर शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले असले तरीही विविध विभागांचे अद्यापही शेकडो जीआर अजूनही वेबसाईटवर अपलोडही करण्यात आलेले नाहीत. हे जीआर म्हणजे कोणाचे तरी हित जपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे.
एकाच दिवसात 160 जीआर
दरेकर यांनी सांगितले की, विरोधी पक्ष नेते या नात्याने तीन दिवसांपूर्वी राज्यपालांना पत्र पाठवून एकाच दिवसात 160 जीआर काढण्यात आल्याची माहिती देत हा सर्व प्रकार संशयास्पद असून यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती राज्यपालांकडे केली होती.
अडीच वर्षांच्या काळात सरकारला निर्णय घेण्यास वेळ मिळत नव्हता, पण जे शेकडो जीआर काही दिवासांमध्ये काढण्यात आले, यामध्ये गैरव्यवहार झाल्याची दाट शक्यता असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
जीआर थांबविण्याची विनंती
काही लोकांचे हित साधण्यासाठी घाईगर्दीत हे जीआर काढण्यात आले आहेत. तसेच राज्यात राजकीय अस्थिरता असताना व सरकार अल्पमतात असताना असे निर्णय घेणे उचित नव्हे.
म्हणूनच हे सर्व जीआर थांबविण्याची विनंती आपण राज्यपालांकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पैसे कमविण्याचा सपाटा
राज्य सरकारने जरी शासन निर्णय काढले तरी हा प्रश्न राज्यातील जनतेचा आहे व सर्व पैसा जनतेचा आहे. कारण सरकार हे जनतेचे आहे.
जनतेच्या पैश्यांचा अपव्यय होऊ नये व अवास्तव खर्च होऊ नये. हीच आमची प्रामाणिक भावना आहे असे सांगतानाच दरेकर यांनी सरकार अल्पमतात असताना व राज्यपालांना यांसदर्भात पत्र देऊनही असे शासन निर्णय घेण्यात आले आहेत.
त्यामुळे या सरकारला आता कशाचीच भीती राहिलेली नाही. केवळ पैसे कमविण्याचा सपाटा राज्य सरकारचा दिसत असल्याचा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.
सरकार अल्पमतात
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास 50-51 आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला असलेल्या पाठिंब्याच्या संख्येतून हे आमदार कमी केले तर सरकार अल्पमतात असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
32 विभागांचे 443 जीआर
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने 17 जून ते 27 जून या काळात शासनाच्या 32 विभागांकडून एकूण 443 जीआर काढण्यात आले आहेत.
यामध्ये सर्वाधिक 152 जीआर हे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून काढण्यात आले तर मृदू व जलसंधारण विभागाचे 32, शालेय व क्रिडा विभागाचे 27, महसूल व वन विभागाचे 23, सार्वजनिक आरोग्य विभागाचे 22, जलसंपदा विभागाचे 20,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे 19, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे 17 जीआर आदी प्रमुख विभागांचा समावेश असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज सविस्तरपणे कागदपत्रांसह सादर केली.(स्रोत:TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज