मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नामांतर केल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने अहमनदगरच्या नामांतरची घोषणा केलीये.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून अहमदनगरचं नामांतर ‘अहिल्यादेवीनगर’ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीये.
जामखेडच्या चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते.
याच कार्यक्रमात नामांतराची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. याशिवाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, स्वागताध्यक्ष आमदार राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, रमेश शेंडगे यावेळी उपस्थित होते..
अहिल्यादेवींचं नाव दिल्याने जिल्ह्याचा सन्मान वाढेलयावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय घेण्याचे भाग्य आमच्या सरकारला मिळाले आहे.
अहिल्यादेवी यांचे कार्य हिमालयाएवढे होते. त्यांचे नाव दिल्याने या जिल्ह्याचा सन्मान वाढणार आहे. अहिल्यादेवी यांची ३०० वी जयंती आपण जगाला हेवा वाटवा, अशा पद्धतीने साजरी करू- मुख्यमंत्री राज्यात सध्या सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे.
गेल्यावर्षी येथे येऊन काही मंडळींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर अवघ्या २० दिवसांताच त्यांचे सरकार आम्ही घालविले.
अहिल्यादेवी यांची ३०० वी जयंती आपण जगाला हेवा वाटवा, अशा पद्धतीने साजरी करू. धनगर समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या एका बैठकीत सोडविल्या जातील, असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्री छत्रपतींचा मावळा : फडणवीसयापूर्वी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, राजामाता अहिल्यादेवी खऱ्या अर्थाने धर्मरक्षक होत्या. त्यांनी अनेक मंदिरे वाचविली. खऱ्या अर्थाने त्यांनी धर्मरक्षणाचे काम केले.
त्यांचे नाव या जिल्ह्याला दिले पाहिजे, अशी मागणी होत आहे. ती योग्यच आहे. आमच्या सरकारने छत्रपती संभाजीगर आणि धाराशीव निर्माण केले. तसेच या जिल्ह्याचेही नाव बदलले जाईल.
छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या मागणीवर सरकारचा निर्णय जाहीर करावा. धनगर समाजाच्या हिताच्या अनेक योजना राबविण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
गोपीचंद पडळकर ठरले हिरोआजच्या जयंती उत्सवाचे स्वागताध्यक्ष प्रा. राम शिंदे होते. मात्र, संपूर्ण कार्यक्रमावर आमदार गोपीचंद पडळकर यांचीच छाप दिसून आली. वक्त्याने त्यांचे नाव घेताच प्रेक्षकांमधून टाळ्या आणि शिट्टया येत होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाच्या सुरवातीलाच त्यांना जवळ बोलावून घेतले.
त्यानंतर जेव्हा नामांतराची घोषणा केली, तेव्हाही प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. गेल्यावर्षी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी सरकारी कार्यक्रमाच्यावेळी पडळकर यांना चौंडीत प्रवेश बंदी करण्यात आली होती. गावाच्या बाहेरच त्यांना अडवून धरण्यावरून गोंधळ झाला होता.
जयंती समारंभानंतर काही दिवसांतच पडळकर यांनी सरकारला पत्र लिहून अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगरी नाव देण्याची मागणी केली. त्यानंतर सत्तांतर झाले. पहिल्याच अधिवेशनात सरकारने यासंबंधीची घोषणा केली. त्याची कागदोपत्री प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
आज जयंतीचे निमित्त साधून मुख्यमंत्र्यांनी नामांतराचा निर्णय झाल्याची घोषणा केली. त्यामुळे आजही पडळकर हिरो ठरले. नामांतरानंतर ‘तसाच’ तिढा उद्भवणार?यापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असे केले होते. केंद्र सरकारनेही या नामांतराला मंजुरी दिली होती.
मात्र, याविरोधात अनेकांनी न्यायालयात धाव घेतली होती. या तांत्रिक आणि प्रशासकीय पेचांमुळे अद्याप शासन दरबारी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव ही नवी नावे वापरण्यास सुरुवात झाली नव्हती. हा पेच सुटेपर्यंत शासन दरबारी औरंगाबाद आणि उस्मानाबाद हाच उल्लेख प्रचलित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अहमदनगरच्या नामांतरानंतरही असाच तिढा उद्भवणार का, हे पाहावे लागेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज