टीम मंगळवेढा टाईम्स।
लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यात आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. लोकसभेत महायुतीला म्हणावं असं यश मिळालं नाही. त्यामुळे आता युतीने विधानसभा निवडणुकीसाठी जोर लावला आहे.
काहीही करुन मित्र पक्षातील नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी ओढावून घ्यायची नाही. यासाठी महायुतीकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत.
अशातच आता अनेक दिवसांपासून रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारदेखील लवकरच केला जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे युतीतील नेमकी कोणाची वर्णी मंत्रीपदी लागणार याची उत्सुकता आमदारांना लागली आहे.
निवडणुकीआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो आणि यासाठी तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे. बऱ्याच काळापासून राज्यमंत्रिपदाचा विस्तार झाला नाही. अनेक आमदार मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. तर वरिष्ठांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होऊ शकतो. तर पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं होतं. तर राज्य मंत्रिमंडळ विस्तार झालाच तर कोणत्या नेत्यांची वर्णी मंत्रीपदी लागू शकते याबाबतची काही नावे चर्चेत आहेत.
‘या’ आमदारांची नावे चर्चेत
यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आशिष जैस्वाल, संजय शिरसाट, भरत गोगावले यांच्यासह यामिनी जाधव आणि लता सोनवणे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इंद्रनील नाईक, संग्राम जगताप आणि अण्णा बनसोडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
भाजपकडून मंत्रिमंडळ वर्णी लागण्याच्या चर्चेत आमदार नितेश राणे, मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, माधुरी मिसाळ, मनीषा चौधरी, संजय कुटे, राणा जगजीत सिंह पाटील आणि देवयानी फरांदे यांची नावे आहेत.
येत्या 27 जूनपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल असं बोललं जात आहे. त्यामुळे आता कोणत्या नेत्याला मंत्रिपदाची लॉटरी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज