मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सुनंदा शंकर घोडके या महिलेचा खून करण्याबरोबर रेश्मा दादासाहेब पळसे हिच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी आरोपी भीमराव राठोड, राहुल राठोड, रोशन राठोड, राजू चव्हाण या चार आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. मोहिते यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची व प्रत्येकी रक्कम रुपये 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अक्कलकोट येथील शिवाजीनगर तांडा येथे राहणारे भीमराव देवराव राठोड (वय 42), राहुल भीमराव राठोड (वय 21), राजू महादेव चव्हाण (वय 19) व रोशन भीमराव राठोड (वय 19) हे 3 मे 2015 रोजी एमएच 13 एझेड 8196 या क्रमांकाच्या क्लुझर जीपमधून सोलापूरकडून मंगळवेढाकडे जात होते.
गाडी कामती (बु॥) गावच्या पुढे थोड्या अंतरावर मंगळवेढाकडील बाजूस आल्यानंतर यातील भीमराव राठोड याने रेश्मा पळसे हिचा दोरीना गळा आवळला व ती बेशुद्ध झाल्यानंतर त्याच दोरीने तिची बहीण सुनंदा घोडके हिचा गळा आवळून खून केला. यावेळी त्या चौघांनी रेश्माच्या अंगावरील सोन्याचे टॉप्स, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे गंठण, अंगठी, नेकलेस व सॅमसंग कंपनीचा मोबाईल तसेच सुनंदा शंकर घोडके हिच्या अंगावरील सोन्याचे गंठण, मणीमंगळसूत्र, कानातील टॉप्स, अंगठी आणि एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल काढून घेऊन दोघींना कोरवली गावच्या माळरानावर टाकून दिले.
त्यामध्ये सुनंदा शंकर घोडके ही मृत झाली व रेश्मा दादासाहेब पळसे ही गंभीररित्या जखमी झाली. अशा आशयाची फिर्याद रेश्मा पळसे हिने कामती पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून कामती पोलिस ठाणे पोलिसांनी वरील आरोपींविरुद्ध भादंवि कलम 302, 307, 397 प्रमाणे गुन्हा नोंद केला.
हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. मोहिते यांच्या कोर्टात चालला. या खटल्यामध्ये सरकारतर्फे एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यामध्ये जखमी फिर्यादी, नेत्रसाक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, नायब तहसीलदार के. व्ही. बडवे, तपासी अंमलदार एपीआय एस.डी. झाडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
याप्रकरणी सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी युक्तिवाद केला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. यातील नेत्रसाक्षीदार यांच्या साक्षी, परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे कोर्टासमोर मांडून आरोपी हे वर नमूद कायद्यांतर्गत दोषी असल्याचे सांगितले. त्यांनी केलेला युक्तिवाद व सादर केलेला पुरावा आणि न्यायनिवाडे या गोष्टी न्यायालयाने ग्राह्य धरुन सर्व आरोपींना दोषी धरुन मरेपर्यंत जन्मठेप व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 3 वर्षे कारावास, अशी शिक्षा सुनावली.
यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी, तर आरोपींतर्फे अॅड. राजेंद्रसिंह बायस यांनी काम पाहिले. कामती पोलिस ठाण्याचे हवालदार ए.ए. शेख यांनी कोर्टपैरवी म्हणून मदत केली.
आरोपींनी न्यायाधीशांवर केला होता हल्ला
हा खटला चालू असताना आरोपींनी न्यायाधीशांवर हल्ला केला होता. त्यामुळे न्यायालयाने आरोपींविरुद्ध वेगळा खटलादेखील दाखल केला होता. आरोपीने खटला थांबविण्यात यावा, इतर न्यायालयाकडे वर्ग करण्यात यावा यासाठी उच्च न्यायालय, प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे अर्ज केले होते. परंतु, उच्च न्यायालयाने विश्वासार्हता दाखवून या कोर्टातच खटला चालविण्याचे आदेश दिले. दरम्यान, आरोपींच्या वकिलांनी वकिलपत्र काढून घेतल्याने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आरोपींकरिता स्वतंत्र वकिलांची नेमणूक केली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज