मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । न्यूझीलंड दौऱ्यानंतर आता भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघात पांड्या, भुवनेश्वर कुमार, धवन यांचे पुनरागमन झाले आहे. तर शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहलीला आफ्रिका दौऱ्यातून विश्रांती देण्यात येईल असं म्हटलं जात होतं. मात्र आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाचे नेतृत्व विराटकडेच आहे. तर रोहित शर्मा अजुन दुखापतीतून सावरला नसल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे.
भारताच्या संघातून मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी यांना संघातून बाहेर बसवलं आहे.नवनियुक्त निवड समितीच्या प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आला आहे. मयंक आणि शमी यांना विश्रांती दिलीय की न्यूझीलंड मधील कामिगरीमुळे त्यांना डच्चू दिला का असा प्रश्न आहे.
मयंक अग्रवालने न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेत 3 सामन्यात मिळून 36 धावा केल्या. तर शमी न्यूझीलंड दौऱ्यात टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत खेळल्यानंतर त्याला विश्रांती देण्यात आल्याची चर्चा आहे. शेवटच्या कसोटी सामन्यात त्याच्या हाताला दुखापत झाली होती.
भारताचा एकदिवसीय क्रिकेट संघ – विराट कोहली, शिखर धवन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव आणि शुभमन गिल.न्यूझीलंड दौऱ्यात खराब कामगिरी करणाऱ्या शार्दुल ठाकुर आणि शिवम दुबे यांनाही संघातून वगळण्यात आलं आहे. ठाकुरने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत 3 सामन्यात फक्त 4 गडी बाद केले. तर टी20 मालिकेतील गचाळ कामगिरीमुळे शिवम दुबेला एकदिवसीय मालिकेत संधीच दिली नव्हती. आता पांड्याचे पुनरागमन झाल्यानं त्याला बाहेर बसवलं आहे.
भारताचा हुकुमी एक्का हार्दिक पांड्याने सप्टेंबर 2019मध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो गेले कित्येक महिने मैदानाबाहेर होता. नुकत्याच झालेल्या डीवाय पाटील टी-20 लीगमध्ये हार्दिक पांड्याने 39 चेंडूत 105 धावांची शानदार शतकी खेळी केली होती. तर, शानदार गोलंदाजी करत 5 विकेटही घेतल्या होत्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज