मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशभरात कोरोना विषाणू वेगाने हातपाय पसरू लागला असून, शुक्रवारी (ता.६) भारतात बाधितांची संख्या ३१ वर पोचली. या विषाणूंच्या प्रसाराचा वेग लक्षात घेता सरकारने आणखी ३१ प्रयोगशाळांमध्ये या विषाणूंच्या तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली असून, आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करत लोकांना गर्दीपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांना ब्रेक लावण्यात यावा, तसेच अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करताना राज्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.विद्यापीठ अनुदान आयोगानेही देशातील सर्वच महाविद्यालयांना सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. विषाणूग्रस्त देशांमधून मायदेशी परतलेल्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना चौदा दिवसांसाठी वेगळे ठेवण्यात यावे, असेही आयोगाने म्हटले आहे.
सध्या मांसाहारी पदार्थांमधून या विषाणूंचा प्रसार होत असल्याच्या अफवा पसरल्यानंतर सरकारने मात्र याकडे लोकांनी दुर्लक्ष करावे, असे आवाहन केले. महाराष्ट्रातही अन्न आणि प्रशासन विभागाने डॉक्टरांनी सूचना केल्यानंतरच संबंधित रुग्णांना औषध विक्रेत्यांनी कोरोनासंदर्भातील कीट द्यावे, असे निर्देश दिले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज