मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पिंपळवाडी (ता. करमाळा) येथील शेतकऱ्याला रोजगार हमी योजनेतून लावलेल्या लिंबूच्या बागेचे बिल काढण्यासाठी कृषी सहाय्यकाने पैसे मागितले असल्याची तक्रार पिंपळवाडी येथील आदिनाथ हंबीरराव काळे यांनी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, रोजगारहमी मंत्री व कृषी अधीक्षक, सोलापूर यांच्याकडे केली आहे.
दोन वर्षे होऊन गेली तरी मिळाले नाही बिल
या प्रकारामुळे करमाळा कृषी विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. पिंपळवाडी येथील आदिनाथ हंबीरराव काळे यांनी 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दीड एकरावर लिंबूच्या झाडांची लागवड केली होती.
दोन वर्षे उलटून गेली तरी या शेतकऱ्याला अद्याप अनुदान मिळाले नाही. अनुदानाच्या बिलासाठी या शेतकऱ्याने वारंवार मागणी केली. यासाठी करमाळा कृषी कार्यालयात अनेक वेळा फेऱ्या मारल्या; मात्र बिल मिळाले नाही. त्याचे पहिले बिल 30 जानेवारी 2018 रोजी आठ हजार 442 रुपये मिळाले. परंतु बाकीचे राहिलेले 65 हजार 365 रुपये बिल दोन वर्षे होऊन गेली तरी अद्याप मिळाले नाही.
याबाबत या शेतकऱ्याने मुख्यमंत्री, कृषिमंत्री, रोजगार हमी मंत्री, जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करूनसुद्धा त्याला अद्याप अनुदानाचे बिल मिळाले नाही. दुसरे बिल काढण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक केकान हे पैशांची मागणी करतात. यामुळे बिल काढण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे संबंधित शेतकऱ्याने सांगितले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज