मंगळवेढा : समाधान फुगारे
मंगळवेढा तालुक्यासाठी संत दामाजी नगर व चोखामेळा नगर या दोन ग्रामपंचायती नंतर आणखीन एक ग्रामपंचायतिची निर्मिती केली जाणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील कान्होपात्रा ग्रामपंचायत स्वतंत्र करण्याचाही निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
दरम्यान डॉ.दत्तात्रय माळी यांनी कान्होपात्रा ग्रामपंचायत होण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे.
‘हायमास्ट’चा 41 लाखांचा निधी खर्च वादात
जिल्हा परिषदेच्या 41 लाखांच्या निधीतून हायमास्ट दिवे बसविण्याचा विषय सोमवारी स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला. मात्र, हा निधी कोणत्या विभागाकडून खर्च करण्यात येत आहे, त्याचे निकष काय असणार, याची माहिती अधिकार्यांना देता आली नाही, त्यामुळे सभेत हा विषय नामंजूर करण्यात आल्याची माहिती जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात दुपारी अध्यक्ष कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा घेण्यात आली. हायमास्ट दिव्यांच्या खरेदीच्या विषयाबाबत जि.प. अध्यक्ष व बांधकाम समितीच्या सभापतींनाही प्रशासनाने पूर्वकल्पना दिली नसल्याचे यावेळी दिसून आले.
त्यामुळे हा विषय सभेपुढे सादर केलेल्या बांधकाम विभाग क्रमांक दोनच्या अधिकार्यांना पदाधिकार्यांनी चांगलेच धारेवर धरले.
अकलूज-माळेवाडी नगरपरिषद करण्याचा, तर महाळूंग-श्रीपूर ग्रामपंचायती नगरपंचायती करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. हातपंप दुरुस्तीसाठी 50 लाखांचा निधी, तर हातपंप पाईप खरेदीसाठी 41 लाखांच्या निधी तरतूदीस यावेळी मान्यता देण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील ग्रामपंचायतीला व्यापारी गाळे बांधकाम करण्यासाठी जिल्हा ग्राम विकास निधीतून 22 लाखांचे कर्ज मंजूर करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
पंढरपूर तालुक्यातील करोळे ग्रामपंचायतीस व्यापारी गाळे बांधकामासाठी 7 लाख 50 हजारांचा कर्ज मंजूर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जि.प. आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकांना प्रोत्साहनपर पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी 35 लाखांचा निधी खर्च करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. मंगळवेढा तालुक्यातील बेगमपूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील नवीन पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या बांधकामासाठी प्रत्येकी 31 लाखांच्या निधी खर्चासही यावेळी मान्यता देण्यात आली.
जिल्हाभरात ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे रस्ते व अन्य मालमत्ता खोदून केंद्र शासनाने नेमलेल्या कंपन्याकडून केबल घालण्याचे काम सुरु आहे. या कंपन्यांचा शोध घेऊन नुकसान भरपाई जिल्हा परिषदेला मिळविण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. अनुकंपा तत्वावरील रखडलेली भरती प्रक्रिया तातडीने करण्याचेही आदेश यावेळी प्रशासनाला देण्यात आले. खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचेही समायोजन तातडीने करण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान बीओटी तत्वावर विकसित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचेही आदेश यावेळी प्रशासनास देण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, पक्षनेता आनंद तानवडे, सदस्य अरुण तोडकर आदी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज