मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी ५ रुपयांत शिवभोजन थाळी मिळणार आहे. शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येत असून दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत २०० शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली.
या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत भुकेलेल्या आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वत्र लॉकडोउन केले आहे यामुळे बेघर, बाहेरगावचे तसेच विद्यार्थी,यांच्या रोजच्या जेवणाचे वांदे झाले आहेत गोरगरीब,शेतकरी,मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने ५ रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेचा जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे.
मंगळवेढा तालुक्यासाठी २०० थाळीचे उदिष्ट देण्यात आले आहे .शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे.नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा ५ रुपये दर जूनपर्यंत लागू राहणार आहे.
शिवभोजन चालकांसाठी असणार ही नियमावली-
शिवभोजन सुरु झाल्यानंतर चालकांसाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.यामध्ये चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे तसेच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून देणे,जेवण तयार करण्याआधी हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घेणे,भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे,भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घेणे बंधनकारक असल्याची माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली
या निर्णयानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जे लोक स्वतःच्या जेवणाची सोय करू शकत नाहीत अशा गरजू नागरिकांसाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचनेनुसार मंगळवेढा बस स्थानक परिसरात दि.१ एप्रिल पासून शिवभोजन थाळी केंद्र शिवभोजन केंद्र सुरु करण्यात येत आहे.कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर,स्थलांतरित,बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही.याची दक्षता घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिवभोजन दुपारी ११ ते ३ या वेळेत केवळ पाच रुपयात भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. – स्वप्निल रावडे,तहसीलदार.मंगळवेढा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज