मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
राज्यात नागरिक उकाड्याने हैराण होत असतानाच ऐन उन्हाळ्यात आता पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस हा पाऊस कायम राहणार आहे.
१३ आणि १४ मार्च रोजी सोलापूर, पुणे, विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहील.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मागील ४८ तासांमध्ये उत्तर कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट आलेली आहे. पुढील काही दिवसात मुंबई आणि उत्तर कोकण भागात अति उष्ण आणि दमट वातावरण राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सध्या सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होताना पाहायला मिळते आहे. १३, १४ आणि १५ मार्च रोजी दक्षिण महाराष्ट्र आणि राज्यातील काही भागातील विजांच्या कडकडाटासह पावसाची देखील शक्यता पुणे वेधशाळेनी वर्तवली आहे.

अमरावती हे राज्यात सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. शहरात गुरुवारी तब्बल ४२.२अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याचे आग ओकने सुरू झाले असून दिवसाचा पारा झपाट्याने वर गेला आहे . ज्यामुळे विदर्भातील काही शहरांना उष्ण लाटेचा सामना करावा लागत आहे.

याशिवाय अकोला येथे ४२, यवतमाळ ४०, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी ४०.८, नागपूर ३९ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले.दरम्यान एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बदलत्या हवामानामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.
सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर या भागात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. यासोबतच चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.
राज्यातील तापमानात वाढ होत असतानाच दुसरीकडे पावसाचाही मोठा इशारा देण्यात आला आहे. आज दिवसभर तापमानात चढउतार राहण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.

हवामानातील अचानक झालेल्या बदलाचा मोठा फटका धाराशिव जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. तापमानातील चढउतार आणि वातावरणातील बदलामुळे आंब्याला आलेला मोहर पूर्णपणे गळून पडल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
यामुळे जिल्ह्यातील हजारो आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. मोहर नष्ट झाल्याने यंदाच्या हंगामात आंब्याचे उत्पादन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














