टीम मंगळवेढा टाईम्स।
स्व.आ.भारत भालके यांचे स्विय सहाय्यक रावसाहेब फटे यांनी भालके गटाला रामराम ठोकत विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून नव्याने जबाबदारी स्वीकारली आहे.
त्यामुळे भालके गटाला गळती लागली असून फटे यांच्या निर्णयामुळे भालके गटासह समविचारी आघाडीत खळबळ उडाली आहे तर आमदार आवताडे यांच्या गटात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
समविचारीची मोट बांधणाऱ्या स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे यांच्या या निर्णयामुळे तालुक्याच्या आगामी राजकारणातील संदर्भ बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याचा फटका भालके गटासह समविचारी आघाडीला बसू शकतो असे जाणकारातून मत व्यक्त होत आहे.
2008 च्या दरम्यान फटेवाडी सारख्या छोट्या गावातील रावसाहेब फटे यांनी आमदार भारत नाना भालके यांचे कडे विश्वासू सहकारी म्हणून काम करीत,
2011 पासून स्वीय सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गेल्या तेरा ते चौदा वर्षात आपल्या शांत व संयमी स्वभावामुळे व सर्वांना सामावून घेण्याची भूमिका वठवत भारत नानांशी एकनिष्ठ राहून भालके गटाची धुरा चांगल्या पद्धतीने संभाळली
कार्यकर्त्यांना, पार्टीला ऊर्जा देण्याचे काम करत गट वाढीसाठी त्यांनी आजपर्यंत प्रयत्न केले होते कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये दुजाभाव न करता काम कामाचा गुरू व भारत नानांना आपले दैवत मानत गेली 14 वर्षे प्रामाणिकपणे काम करून नेता व कार्यकर्त्यांच्या सुखदुःखांमध्ये सामील होत तन-मन अर्पून काम केले.
कार्यकर्त्यांना आपलेपणाची वागणूक दिली त्यामुळे कार्यकर्ते नेहमीच फटे यांच्या कामावर खुश असत नानांचे कर्तुत्व व फटे यांची कार्यकर्त्यांशी असलेली नाळ यामुळे त्यांची सर्वसामान्यांशी अतूट नाते निर्माण झाले होते.
2009, 2014, 2019 व 2021 च्या पोटनिवडणुकीत भालके गटाला मताधिक्य मिळवून देण्यात नानांच्या बरोबरीने फटे यांचेदेखील योगदान होते.
नाना व फटे यांच्यातील कामाची पद्धत इतकी मिळती जुळती होती की अनेक वेळा देहबोलीतून कार्य कर्त्यांच्या अडचणी ते ओळखत.
एक अतिशय विश्वासू सहकारी म्हणून मंगळवेढा येथील कार्यालयाची काम करण्याची सारी मदार फटे यांच्यावर नानांनी सोपवली होती.
ज्या विश्वासाने नानांनी जबाबदारी दिली होती त्याच विश्वासाने व प्रामाणिकपणे ती जबाबदारी त्यांनी पार पाडली होती.
कै.भारत नाना यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र भगीरथ भालके यांना अल्पशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर मात्र पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले गेल्या वर्षभरापासून नानांचे कायम सहकारी म्हणून वावरणारे रावसाहेब फटे मात्र गेल्या सहा महिन्यापासून राजकारणापासून अलिप्त राहिले होते.
कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव गेल्या सात महिन्यापूर्वी झालेल्या दामाजी कारखाना निवडणुकीत मात्र त्यांनी व त्यांच्या काही सहकार्याने समविचारी आघाडीचा प्रयोग करत आमदार अवताडे यांना सत्तेपासून रोखत समविचारी आघाडीच्या पॅनलची सत्ता कारखान्यावर आणून परिचारक व भालके गटाला एकत्र आणले होते
त्यामुळे भालके गट व परिचारक गटात नवचैतन्य निर्माण झाले होते कारखाना विजयानंतर समविचारी आघाडी कायम राहावी यासाठी काही जणांनी आपली भविष्यातील राजकारणाची गोळा बेरीज सुरू केली आहे.
आमदार आवताडे यांनी रावसाहेब फटे आमदार समाधान आवताडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहण्यास सुरू केले असून फटे यांच्या आमदार आवताडे गटात अचानक जाण्याच्या निर्णयामुळे विरोधी गटात खळबळ उडाली आहे.
फटे यांच्या अवताडे गटात तील जाण्यामुळे आवताडे गटाला निश्चित फायदा होणार असला तरी तालुक्यातील भविष्यातील राजकारनाला कलाटणी मिळू शकते. तसेच फटे यांना तालुक्यातील गावनिहाय खडा न खडा माहिती असून त्याचा फायदा अवताडे गटाला होणार आहे.
कै भारत नाना यांनी दक्षिण भागातील पाण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची फटे यांना जाण असून हे प्रश्न तसेच तालुक्यातील इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून ते प्रयत्न करतील.
तसेच जो उत्साह भालके गटात असताना होता त्याच्या दुपटीने ते अवताडे गटात काम करून आमदार अवताडे यांच्या भविष्यातील राजकारणा च्या यशासाठी ते प्रयत्नशील राहतील असा कयास नागरिकांमधून बांधला जात आहे.
फटे यांच्या अवताडे गटात जाण्याच्या निर्णयाने अवताडे गटाला भविष्यात फायदा होण्याची शक्यता असली तरी भालके गटाला मात्र अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे
या निर्णयाचा समविचारी आघाडीच्या पुढील राजकारणावर देखील परिणाम होणार असून आमदार अवताडे हे दामाजी कारखाना निवडणुकीपासून अतिशय सावधपणे पावले टाकत असून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील समविचारीच्या अनेक नाराज घटकांना आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज