मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । महावितरणच्या बारामती परिमंडलमध्ये उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस) कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्याचे काम सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत चार हजार 773 कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्याच्या यंत्रणेची उभारणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी तीन हजार 909 कृषिपंपांची वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सोलापूर शहर व ग्रामीण, अकलूज, पंढरपूर, बार्शी या पाच विभागांतर्गत मार्च 2018 अखेर पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या आठ हजार 438 कृषिपंपांना “एचव्हीडीएस’द्वारे नवीन वीजजोडणी देण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत चार हजार 773 रोहित्रांसह वीजयंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.
“एचव्हीडीएस’मधून प्रत्येक रोहित्रावर एक किंवा दोन कृषिपंपांचा वीजपुरवठा असल्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण नगण्य होईल. कृषिपंपधारकांनी विद्युत भाराच्या मागणीनुसार रोहित्रांची क्षमता ठरविण्यात येत आहे. या प्रणालीत 10 केव्हीए, 16 केव्हीए व 25 केव्हीए क्षमतेचे रोहित्र वापरण्यात येत आहेत. उच्चदाब वाहिनी ही ग्राहकाच्या विहिरीपर्यंत उभारण्यात येत असल्याने लघुदाब वाहिनी विरहित वीजजोडणी राहणार आहे. त्यामुळे कृषिपंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा होणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज