टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्या अनेक वर्षांपासून मंगळवेढा तालुक्यातील 35 गावाचा पाणी प्रश्न प्रलंबित असून या उपसा सिंचन योजनेस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून केंद्र सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवेढा तालुक्यातील बोराळे,नंदेश्वर,डोंगरगाव व मंगळवेढा येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आले असता बोलत होते.
व्यासपीठावर खा.जयसिध्देश्वर महाराज,माढ्याचे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर,भाजप नेत्या चित्रा वाघ,आ.प्रशांत परिचारक,माजी सहकारमंत्री आ.सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,आ.गोपीचंद पडळकर,आ.सचिन कल्याणशेट्टी,धैर्यशील मोहिते पाटील,माजी मंत्री राम शिंदे, आ.राम सातपुते, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख,जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, प्रा.बी.पी.रोंगे,नामदेव जानकर,बालाजी भेगडे, आदीजन उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आजपर्यंत पाणी देतो म्हणून अनेक भूलथापा देऊन हे निवडून आले होते. पण पाणी काही मिळाले नाही.निवडणूक आली की कोणता तर बनावट कागद दाखवून फसवणूक करून मते मिळवली आहेत.
सामाजिक कार्याची आवड मेहनती संघर्ष करणारा नेता म्हणून समाधान आवताडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. आता दामाजीच्या मागे पांडुरंग उभा असल्याने समाधान आवताडे यांचा विजय निश्चित आहे.
गेल्या दिड वर्षात या सरकारचे नाव बदलून महा वसुली आघाडी नाव झाले आहे. जिथे जाऊ तिथे खाऊ अशी या सरकार मधील मंत्र्यांची कामे आहेत.
कोरोना काळात राज्यातील नागरिकांना एकाही रुपयांची मदत ठाकरे सरकारने केली नाही. जे मुख्यमंत्री बांधावर जाऊन सांगत होते हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळवून देऊ पण या सरकारने फक्त कवडीमोल मदत केली. सावकारी पध्द्तीने वीज बिलाची शेतकऱ्यांकडून वसुली केली.
लॉकडाउनच्या काळात जनतेच्या हाताला काम नव्हते त्यांना दुप्पट बिले देऊन आपली तिजोरी भरली,विजेची थकबाकीच्या नावाखाली यांनी शेतकऱ्यांची वीज कट केली त्यांची ट्रान्स्फर उचलून नेल्याचे पाप यांनी केले आहे.
मंगळवेढा-पंढरपूर येथील निवडणूक आहे म्हणून शेतकऱ्यांची वीज कट केली नाही 17 तारखेनंतर शेतकऱ्यांची वीज हे सरकार परत कट करणार असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा विजेचा सामना करावा लागणार आहे.
राज्याला 25 हजार कोटीचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक योजना मार्गी लागल्या आहेत.
मराठा समाजाला आम्ही दिलेले आरक्षण या सरकारने जाणूनबुजून काढून घेतले. या नालायक सरकारच्या गुणामुळे अनेकांचे आरक्षण यांनी रद्द केले आहेत. या भ्रष्टाचार बलात्कारी सरकारला जागा दाखवून दिली पाहिजे बोलून 17 तारखेला समाधान आवताडे यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
समाधान आवताडे बोलताना म्हणाले की,ही निवडणूक विधानसभेची निवडणूक आहे, पण विकासाच्या मुद्द्यावर विरोधक बोलताना दिसत नाहीत, विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून ते कारखान्या विजयी बोलत आहे.या मतदारसंघात विरोधकांनी कोणती विकासाची कामे केली ते सांगावे.
पराभव समोर दिसू लागल्याने विरोधक दामाजीच्या सभासदांवर बोलत आहेत अफवा पसरवत आहेत.पण दामाजीच्या एकाही सभासदाचे सदस्यत्व रद्द होणार नसल्याचे समाधान आवताडे यांनी स्पष्ट केले.कारखानाचा मोबदला सर्व सभासद घेत आहेत मग सभासत्व रद्द कसे होईल असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला आहे.
विठ्ठल कारखान्यावर 600 कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे.ऊस मागणाऱ्या शेतकऱ्यांना तुरुंगात टाकण्याचे पाप त्यांनी केले आहे.
बारामती उपसा सिंचन योजनेला तुम्ही निधी देताय मग 35 गावाला का निधी दिला नाही. विरोधकांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले पण या काळात कोणती विकास कामे केली आहेत ते सांगावे असा प्रश्न विचारला आहे.
आ.प्रशांत परिचारक म्हणाले की, आजपर्यंत विरोधकांनी येथील जनतेला खोटी आश्वासने देऊन निवडून आले होते. अनेक अपप्रचार करून मते मिळवली.
मी आणि समाधान आवताडे आम्ही दोघांनी केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. ही निवडणूक राज्याची दशा आणि दिशा बदलणारी निवडणूक आहे.
35 गावाच्या पाणी प्रश्नावर प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी आश्वासने दिली आहेत, पण कालच्या आर्थिक तरतूदमध्ये यासाठी निधी का उपलब्ध केला नाही.समाधान आवताडे निवडणूक जिंकणे हेच स्व.सुधाकरपंत परिचारक यांना श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज