टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अनुभव आल्यानंतर दुसऱ्या लाटेपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील आमदार-खासदारांनी मतदारसंघातील जनतेसाठी आपल्या निधीतून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकडे लक्ष देण्याची गरज होती.
त्याकडे त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत राजकीय विरोध करण्याची एकही संधी मात्र सोडली नाही. कधी लसीवरून तर कधी इंजेक्शन वरुन कधी महागाई तर कधी राज्य सरकारच्या कोरोना रोखण्याच्या अपयशावर सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवत आंदोलने केली.
परंतु , मोजके आमदार वगळता एकाही आमदार, खासदाराने दुसऱ्या लाटेत वेळेत निधी दिला नाही. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नावावर आपले अपयश खपविण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी सोडला नाही , अशी चर्चा आहे.
सोलापूर जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ असून दोन विधान परिषदेचे आमदार आहेत. तसेच माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे दोन खासदारही आहेत. सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४३ ते ४५ लाखांपर्यंत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तर अनेकजण रस्त्यावर आले. पहिली लाट ओसरतानाच आरोग्य विभागाने दुसऱ्या लाटेची पूर्वकल्पना दिली होती. अशा परिस्थितीत राज्य सरकारने आमदारांना मिळणाऱ्या दोन कोटींपैकी एक कोटीचा निधी कोविडसाठी खर्चास परवानगी दिली.
त्यानंतर सर्वच आमदारांनी तो निधी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी देणे अपेक्षित होते. मात्र , तसे काहीच झाले नाही. एप्रिलपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आणि शहराबरोबरच ग्रामीण भागाची रुग्णसंख्या दीड लाखापर्यंत पोचली. तर साडेतीन हजार जणांचे कोरोनाने बळी घेतले.
पालकमंत्र्यांनी लक्ष दिले नाही, पालकमंत्री बदला, पालकमंत्र्यांमुळेच सगळे घडले, अशी टीका करणाऱ्या बहुतेक आमदारांनीही त्यावेळी आपला आमदार निधीचा एक छदामही कोविडसाठी दिला नव्हता , हे विशेष. आता सर्वच आमदारांनी त्यांचा निधी कोविडसाठी देऊ केला असून ,निधीची पत्रे जिल्हा नियोजन कार्यालयाकडे पाठविली आहेत.
परंतु , कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी अथवा आल्यानंतर तत्काळ तो निधी देऊन उपाययोजना का केल्या नाहीत, राजकीय विरोधात जनतेचे हाल झाले, अनेकांना जीव गमवावा लागला , त्याला जबाबदार नेमका कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
खासदारांकडून छदामही नाही
केंद्र सरकारने कोरोना काळात तिजोरीची आर्थिक स्थिती बिघडल्याने दोन वर्षासाठी खासदार निधीला ब्रेक लावला. मात्र , यापूर्वी दिलेल्या निधीतील दोन-चार कोटींचा निधी दोन्ही खासदारांचा अजूनही शिल्लक असल्याची माहिती जिल्हा नियोजन कार्यालयातील सूत्रांनी दिली.
माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व सोलापूरचे खासदार डॉ . जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी कोरोना काळात अनेक ठिकाणी दौरे केले. अनेक आंदोलनात सहभाग नोंदविला, परंतु त्यांचा शिल्लक निधी कोरोनासाठी दिला नाही.
आता डॉ. महास्वामी यांनी निधी देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर दुसऱ्या खासदारांकडून निधी मिळाल्याचे एकही पत्र आम्हाला मिळाले नसल्याचेही जिल्हा नियोजन कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज