टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापुरातला दुग्धव्यावसाय सोलापूरच्या राजकारणात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. ज्याची सहकार क्षेत्रावर पकड त्याची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असा हिशोब सोलापूरच्या राजकारणात चालतो.
त्यामुळेच सर्वच नेतेमंडळी दूध संघाच्या निवडणुकीत आपला जोर लावतात. सध्या सोलापूर जिल्हा दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या निवडणुकीने वातावरण तपावलं आहे.
या निवडणुकीसाठी उमेवारांच्या अर्जाची छननी पार पडली आहे. या छननीनंतर अनेकांना काय करावं? हे सुचेनाय कारण सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ निवडणुकीच्या अर्ज छाननीमध्ये दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय.
26 जणांचे अर्ज नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये बाद
दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, संचालक दिपक माळी, सिद्धेश्वर आवताडे, प्रभाकर कोरे यांच्यासह 26 जणांचे अर्ज नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये बाद झालेत.
जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून या निवडणुकीचे उमेदवारी अर्जाची छाननी सोमवारी जिल्हा दूध संघाच्या सभागृहात पार पडली. त्यानंतर सोलापुरातील दिग्गज नेतेमंडळी शॉकमध्ये आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या उपस्थितीत ही छाननी झाली. या वेळी 35 हरकती दाखल झाल्या होत्या. त्यावर दुपारी तीन वाजता सुनावणी घेण्यात येऊन मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजता निकाल जाहीर करण्यात आला.
यामध्ये 26 जणांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. 26 बाद अर्जापैकी रेवती साखरे थकबाकीदार, मीराबाई कसबे, भीमराव कोकरे, शहाजी पाटील यांचे जातीचे प्रमाणपत्र नाहीत, उर्वरित सर्व दूध संघाला मागच्या तीन वर्षात नियमानुसार दूध पुरवठा केला नाही म्हणून अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
अपिल करू शकतात
अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना कलम 152 ब नुसार येत्या तीन दिवसात विभागीय उपनिबंधक (डेअरी) पुणे यांच्याकडे अपिल करू शकतात त्या अपिलात अर्ज मंजूर झाला तर ते निवडणुकीस पात्र होतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी दिली.
एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज बाद झाल्याने सहाजिकच या नेत्यांची निवडणूक लढवण्याची संधी हुकली आहे.
दूध संघाची निवडणुक दरवर्षी अतिशय चुरशीची होते, सोलापूर पट्ट्यात दूधाचे उत्पादन चांगले आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रात सोलापूरचाही चांगलाच दबदबा आहे. सहकार क्षेत्रावर ज्याची पकड त्याची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असेच एकंदरीत समीकरण असते.(स्रोत:TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज