टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा अबोला आता संपूर्ण शिरूर लोकसभा मतदार संघातील सुमारे १८ लाख मतदारांसाठी गंभीर प्रश्न बनला आहे.
कोल्हे यांनी त्यांची राजकीय भूमिका काहीही घेवो अथवा त्यांनी त्यासाठी काहीही करो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते मतदार संघाच्या संपर्कात नसणे, धक्कादायक मानले जात आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना निवडून दिले आहे, तेच गायब झाले, असे म्हणण्याची वेळ शिरूरच्या मतदारांवर सध्या आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेटीनंतर त्यांची भाजपप्रवेशाचीही चर्चा रंगली आहे. त्यांचे याबाबतचे मौन संभ्रम वाढवत आहे.
शिरूर म्हणजे शिवसेनेसाठी हक्काची लोकसभेची जागा. मात्र, संभाजी महाराजांचा इतिहास रुपेरी पडद्यावर मांडताना ज्यांनी शिवसेनेचा लोकसभेतील इतिहास खंडीत करून
आपले सिंहासन तयार केले, ते खासदार डॉ.अमोल कोल्हेंसाठी सध्या संपूर्ण मतदारसंघ व्याकूळ झालेला दिसत आहे.
खासदार कोल्हेंना प्रत्यक्ष भेटणे तर सोडाच उलट फोनवरही ते भेटत नाहीत. त्यांचे सध्या काय चालले आहे, त्याबद्दलही ते बोलत नाहीत.
ते मिळाले नाहीत तर काय करायचे, याचीही ते उत्तरे देत नाहीत. सर्वसामान्यांबरोबरच मतदारसंघातील पत्रकारांनाही ते सहजा सहजी उपलब्ध होत नाहीत.
स्टार प्रचारकराच्या यादीतून नाव वगळूनही खासदार शांतच
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नुकतीच स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात खासदार कोल्हे यांचे नाव नसणे, हे अनेकांना पसंत पडलेले नाही.
खरं तर नेमकं काय झालंय आणि असा निर्णय कसा झाला, याबाबत कोल्हेंनी तातडीने बोलायला हवे होते. सोशल मीडियासारख्या माध्यमातून तर ते कायमच सक्रीय असतात.
मग याच प्रकरणाबाबत त्यांनी मौन का पाळले आहे. खरोखरीच राष्ट्रवादीकडून तसा निर्णय झाल्याने कोल्हे अस्वस्थ आहेत. याचा खुलासा होत नसल्याने संभ्रम वाढला आहे.
तेव्हापासून भाजपप्रवेशाची चर्चा
शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाच्या निमित्ताने डॉ. खासदार कोल्हे हे गृहमंत्री अमित शहा यांना नुकतेच दिल्लीत जाऊन भेटले. तेव्हापासूनच कोल्हेंच्या मागे राजकीय शुक्लकाष्ठ लागल्याची मतदार संघात चर्चा आहे.
कोल्हे जेव्हा खासदार झाले, तेव्हाची कॉंग्रेस-राष्ट्रवादीची महाआघाडी, त्यानंतर ते ज्या शिवसेनेचे तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव यांना पराभूत करुन खासदार झाले, त्याच शिवसेनेला सोबत घेऊन झालेली महाविकास आघाडी यामुळे कोल्हेही राजकीय अडचणीत आल्याचे दिसून आले.
कारण, शिवसेनेचे कौतुक करताना राजकीय वैर म्हणून आढळरावांसोबत त्यांचे जुळत नव्हते. भविष्यातही ही अडचण होण्याची चिन्हे असल्याने त्यांनी भाजपकडे आपला मोर्चा वळविल्याची चर्चा मतदार संघात आहे.
एवढं घडूनही कोल्हे मात्र आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने त्यांच्याबाबत संभ्रम वाढला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज