टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यांत गंभीर तर १६ तालुक्यांत मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सरकारने मंगळवारी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधित बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी झाला होता.
त्यानंतर राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून अहवाल मागवण्यात आला होता. या समितीच्या शिफारसींनुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे मंगळवेढा तालुक्यात कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र जास्त असून यंदा अनेक महसूल मंडळांमध्ये पाऊस कमीच झाला. तरीसुद्धा मंगळवेढा व पंढरपूर तालुके दुष्काळाच्या यादीत नाहीत. तालुक्याचे विद्यमान आमदार- माजी आमदार मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार दरबारी विशेष प्रयत्न करतील का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १९१ महसूल मंडळांपैकी जवळपास ९५ महसूल मंडळांमध्ये पावसाने मोठा खंड दिला होता. त्यावेळी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता रब्बीच्या पेरण्या सुरू आहेत, पण ओल कमी असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. उजनी धरणातील पाणीसाठा ५६ टक्क्यांवर आला असून फेब्रुवारीत धरण मायनस होईल, अशी चिंताजनक स्थिती आहे.
दुष्काळ जाहीर झालेल्या ४० तालुक्यांत जमीन महसुलात सूट, पीक कर्जांचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी कामात काही प्रमाणात शिथिलता, पिण्याचे पाणी टँकरने पुरवणे, शेती पंपाची जोडणी खंडित न करणे असे निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत.
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांची नावे पुढील प्रमाणे
बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा (सोलापूर), नंदूरबार (जिल्हा नंदूरबार), सिंदखेड (धुळे), चाळीसगाव (जळगाव), बुलढाणा, लोणार (बुलढाणा), भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा (जालना), छत्रपती संभाजीनगर, सोयगाव (छत्रपती संभाजीनगर),
मालेगाव, सिन्नर, येवला (नाशिक), पुरंदर सासवड, बारामती, शिरुर, दौंड, इंदापूर (पुणे), वडवनी, धारुर, अंबेजोगाई (बीड), रेणापूर (लातूर), वाशी, धाराशिव, लोहारा (धाराशिव), वाई, खंडाळा (सातारा), हातकणंगले, गडहिंग्लज (कोल्हापूर), शिराळा, कडेगाव, खानापूर विटा, मिरज
शेतकऱ्यांना मदत मिळणार
या तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक मदतींसाठी अनुदान दिले जाणार आहे. कोरडवाहू पिकांच्या ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास ही मदत मिळणार आहे. तसेच फळबागा आणि बागायती पिके यांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास शेतीनिहाय पंचनामे करून ही मदत दिली जाणार आहे. शिवाय या तालुक्यातील शाळांतून मध्यान भोजन योजना ही दीर्घ सुट्टीच्या कालावधितही सुरू राहणार आहे. हा आदेश पुढील सहा महिन्यांसाठी लागू असणार आहे.
सोलापूर जिल्ह्याची पाणीपातळी यंदा पाच वर्षानंतर पहिल्यांदाच ०.९७ मीटरने खोलवर गेली आहे. तरीपण, जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा व बार्शी या पाच तालुक्यातच दुष्काळ जाहीर होणार आहे.
उर्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांचे काय, त्यांना मायबाप सरकारकडून दुष्काळी मदत मिळणार का, आमदार- माजी आमदार त्यासाठी सरकारकडे यशस्वी पाठपुरावा करतील का, याकडे बळिराजाचे लक्ष लागले आहे.
प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळ जाहीर होईल. परंतु, उर्वरित उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा व मोहोळ या सहा दुष्काळजन्य तालुक्यांसाठीही विशेष बाब म्हणून सरकारकडून मदत मिळावी, असा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यादृष्टीने तहसीलदारांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागविले आहेत. – कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज