मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा ।
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील उमेदवार ठरविण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीमध्ये एक मोठा पेच बनून राहिला आहे. भगीरथ भालके यांच्या समर्थनार्थ रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मोठे शक्तिप्रदर्शन झाले असले तरीही आतील बैठकांमध्ये अनेकांनी भगिरथदादांच्या विरोधात सूर लावला असल्याचे समजते.
भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडेल हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
युवराज पाटील,गणेश पाटील आणि यांच्यासारखे विठ्ठल परिवारातील काही शिलेदार हे आता पवारांचा आदेश मानून भगीरथ भालके यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील अशी स्थिती नाही. यापेक्षा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या अनुषंगाने काही गणिते मांडली जाऊ शकतात का ? यावर राष्ट्रवादीमध्ये विचार मंथन सुरू आहे.
कै.भालके यांच्या निधनानंतर तातडीने उमेदवार जाहीर करून जर सर्वशक्तीनिशी भगीरथदादांची उमेदवारी ठसवली असती तर ही वेळ आली नसती असाही सल्ला एकाने अजित पवार यांना दिला. आता उमेदवारी जाहीर करण्यासाठी बराच उशीर झाला असून ही धुसफूस मोठ्या प्रमाणात वाढली गेली आहे.
याही परिस्थितीची जाणीव अनेकांनी ना.पवार यांना करून दिली.त्यामुळे पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.अजित पवार यांनी दिल्लीला जाणे टाळले, तथापि जयंत पाटील यांनी रविवारी रात्री दिल्लीला जाऊन त्यांनी शरद पवार यांच्याकडे सर्व अहवाल दिला.
सोमवारी शरद पवार यांनी दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत पंढरपूर पोटनिवडणुकीच्या संदर्भात उल्लेख केला. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर याबाबत किती गांभीर्याने विचार सुरू आहे ? याची साक्ष पटली.
येत्या दोन दिवसातच राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करावा लागणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पार्थ पवार यांचे नाव पुढे आले आहे. त्यांनादेखील उमेदवारी देऊन सर्व शक्तीनिशी राष्ट्रवादीच्या उमेदवारा पाठीमागे एक गठ्ठा उभा करावा यासाठी पर्याय काहींनी सुचविला असल्याचे समजते.(पंढरी संचार)
भाजप बहुजन चेहऱ्याच्या शोधात
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भगीरथ भालके यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. जर उमेदवारी बदलाचा निर्णय झाला असेल तर ती पार्थ पवार यांनाही दिली जाऊ शकते असा एक सूर व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष बहुजन उमेदवाराच्या शोधामध्ये असल्याचे खात्रीलायक वृत्त दैनिक ‘पंढरी संचार’ ने प्रसिध्द केले आहे. प्रशांत परिचारक हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत,
परंतु भाजपाच्या चिन्हापेक्षा अपक्ष उमेदवारी घेऊन त्याला भाजपने पुरस्कृत करावे याकडे त्यांचा कल असल्याचे समजते, परंतु भाजपाच्या अनेक नेतृत्वांना हे मान्य नाही. जर ही निवडणूक लढवली तर कमळाच्या चिन्हांवर लढवायची याकरिता त्यांचा आग्रह कायम असल्याचे सांगितले जाते.
काल प्रशांत परिचारक, समाधान आवताडे,डॉ बी.पी.रोंगे,अभिजीत पाटील यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली. प्रशांत परिचारक यांनी कालपर्यंत निवडणुकीत उतरण्याबाबत कुठलेही संकेत दिले नव्हते. कार्यकर्त्यांकडून विचारणा होत असताना देखील त्यांनी पक्षाचा आदेश काय येतो बघू असेच भाषण केले होते.
परंतु काल प्रथमच निवड समितीसमोर त्यांनी आपली उमेदवारी सादर केली. विधान परिषदेचा राजीनामा देऊन ही निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी केली असल्याचे समजते , परंतु आजपर्यंतचा अनुभव पाहता प्रशांत परिचारक यांचे नेतृत्व लोकाभिमुख होऊ शकते का ? याबाबत भाजपातील काही नेतृत्वांना साशंकता आहे.
त्यापेक्षा एखादा बहुजन समाजाचा उमेदवार देऊन त्याच्या पाठीमागे परिचारक यांची शक्ती उभी करावी आणि त्यांच्या व्यवस्थेच्या जोरावर तो उमेदवार निवडून आणावा असाच विचार भाजपने मांडला असल्याचे दिसते.
देवेंद्र फडणवीस हेच अंतिम निर्णय घेणार
देवेंद्र फडणवीस हेच याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते.दरम्यान चंद्रकांत पाटील आणि श्रीकांत भारतीय या दोघांची मते याबाबत निर्णायक ठरतील असे दिसते.जर परिचारक यांना उमेदवारी मिळणार नसेल तर त्यांना विधान परिषदेचा शब्द देऊन त्यांची पुढील सहा वर्षांकरिता निश्चिती करण्याचेही पक्षामध्ये ठरवले जाईल असेही एका नेत्याने ‘पंढरी संचार’शी बोलताना सांगितले.
तथापि राष्ट्रवादीच्या हातून जर ही जागा खेचून घ्यायची असेल तर त्यासाठी परिचारक यांच्या सुमारे ८० हजार मतांचा गठ्ठा भाजपा उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहणे गरजेचे आहे असे तर्क सध्या लढवले जात आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज