टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील, विशेषतः भीमा नदीकाठच्या भागात गेल्या काही काळापासून घरगुती, शेती पंप आणि उद्योगांसाठी होत असलेल्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत होता.
या गंभीर समस्येची दखल घेत आमदार समाधान आवताडे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या मागणीची मुख्यमंत्र्यांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून संबंधित विभागाला तात्काळ ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

‘तालिका अध्यक्ष’ म्हणून काम पाहताना वेधले लक्ष
सध्या महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवसनात आमदार सुभाष देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नावर तालिका अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मतदारसंघातील व्यथा मांडली.

“माझ्या मतदारसंघात विजेची समस्या अत्यंत गंभीर बनली असून त्यावर तातडीने मार्ग काढावा,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ऊर्जा विभागाला आदेश दिल्याने ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न सुटण्याचे संकेत मिळत आहेत.

शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची नेमकी अडचण काय?
आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि नागरिकांचे हाल मांडले आहेत:

कागदावर ८ तास, प्रत्यक्षात ४ तास गाठणे कठीण:
महावितरणच्या नियमानुसार शेती पंपांसाठी सलग ८ तास वीज मिळणे अपेक्षित आहे. प्रशासनाकडून दिवसा सौरऊर्जेमुळे ८ तास वीज दिली जात असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अनेक भागांत शेतकऱ्यांना ४ तास देखील पुरेशी वीज मिळत नाही.

कमी दाब आणि खंडित वीज: कमी दाबाने आणि सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतीची कामे पूर्णपणे कोलमडली आहेत.
‘भगीरथ’ योजना रखडली:
घरगुती वापरासाठी ‘भगीरथ’ योजनेंतर्गत मिळणारी नियमित सिंगल फेज वीजही गायब असल्याने ग्रामीण भागात नागरिकांना सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

उन्हाळा आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले: तीव्र उष्णतेमुळे नागरिक आधीच त्रस्त असताना, रात्रीच्या वेळी वीज खंडित होत असल्याने लोकांची गैरसोय तर होतेच, शिवाय ग्रामीण भागात चोऱ्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
बैठका निष्फळ ठरल्याने अखेर मुख्यमंत्र्यांचा दरबारात दाद
या समस्येबाबत आमदार आवताडे यांनी संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत यापूर्वी दोन ते तीन वेळा बैठका घेऊनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. अनेक गावांमध्ये संतप्त नागरिकांनी मोर्चे आणि आंदोलने देखील केली होती. प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने अखेर आमदारांनी मुख्यमंत्र्यांचे दार ठोठावले.
मुख्यमंत्र्यांच्या थेट आदेशानंतर आता महावितरण खडबडून जागे झाले असून, नदीकाठच्या गावांमधील वीज पुरवठा कधीपर्यंत सुरळीत होतो याकडे आता संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












